jotiba

ज्योतिबा मंदिराचा समृद्ध इतिहास एक्सप्लोर करणे: एक पवित्र प्रवास

ज्योतिबा मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील मंदिर आहे. ज्योतिबा या देवतेला ज्योतिर्लिंग, केदारलिंग, रवळनाथ, सौदागर अशा विविध नावांनीही उल्लेखतात.कोल्हापूरच्या वायव्येस १४.४८ किलोमीटर अंतरावर ज्योतिबाचा डोंगर आहे. या डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे. ज्योतिबाला केदारेश्वर-केदारलिंग असेही म्हणतात. सपाट प्रदेशात एक हजार फूट उंचीवर, शंखाकृती, हत्तीच्या ‘सोंडे’सारख्या पसरलेल्या ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्‍नागिरी म्हणतात. हा डोंगर पन्हाळय़ापासून कृष्णेकडे गेलेल्या सह्याद्रीच्या फाटय़ाचाच भाग आहे. या डोंगरावरील पठारी भागात ज्योतिबा मंदिर व गाव आहे.

१)इतिहास आणि माहात्म्य : 

ज्योतिबा किंवा केदार या दैवताचा उल्लेख यादवपूर्व काळातही आढळतो. महानुभावाच्या पोथ्यांमध्ये पैठण व जळगाव येथील केदारेश्वर मंदिरांचा उल्लेख आहे. खोलेश्वराच्या शिलालेखातही केदारेश्वराचा उल्लेख आहे. अग्नी, तेज व ज्ञानाचे प्रतीक असलेला ज्योतिबा भक्तांना आपलासा वाटतो. ग्रामीण लोकगीतांतून व ओव्यांतून ज्योतिबाला मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे.‘देवामंदी देव ज्योतिबा लई मोठा चैत्याच्या मईन्यात त्याच्या फुलल्या चारी वाटा’ ज्योतिबा डोंगरावर तीन प्रमुख देवळे आहेत. ती ज्योतिबाचा अवतार असलेल्या केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंगाची आहेत.ज्योतिबा हे दैवत शिव व सूर्याचे रूप मानण्यात येते. 

श्री जोतिबा अथवा केदारेश्र्वर हे बद्रिकेदारेचेच रूप आहे. ब्रम्हा, विष्णू, महेश आणि जमदग्नीचा क्रोधांश या सर्वांचा मिळून एक तेजो:पुंज अवतार म्हणजेच केदारनाथ किंवा जोतिबा! ‘जोतिबा’ या नावाची उत्पत्ती ‘ज्योत’ या शब्दापासून झाली असून ज्योत म्हणजे तेज, प्रकाश! वायू, तेज, आप (पाणी), आकाश व पृथ्वी या पंचमहाभूतांपैकी ‘तेजाचे’ शक्तींदैवत म्हणजेच वाडीरत्नागिरी जोतिबा! पौगंड ऋषिंच्या वंशाला दिवा नव्हता. त्यांनी तपश्यर्या करून बद्रीनाथांना संतुष्ट केले. बद्रीनाथांनी पौगंड ऋषि या त्यांची पत्नी विमलांबुजा यांच्या पोटी जन्माला येण्याचे वचन दिले. त्याप्रमाणे चैत्र शुद्ध षष्टी युक्त सप्तमीच्या दिवशी रविवारी सूर्योदयाला विमलांबुजेच्या ओंजळीत नाथ, ज्योती रूपात प्रगटले. पुढे विमलांबुजेचा भाव जाणून आठ वर्षाचे बटू म्हणून प्रगटले.

२)कथा/आख्यायिका : 

कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीला, दैत्यसंहाराच्या संग्रामात सहाय्य करण्यासाठी जोतिबा हिमालयातून दक्षिणेत आला, अशी कथा केदारविजयात दिलेली आहे. ‘जोतिबा’ हे ‘ज्योतिर्लिंग’ या नावाने लोकसंस्करण आहे. ‘जोतिबाची’ मूर्ती चतुर्भुज, हातात खड्ग, डमरू, त्रिशूल अमृतपात्र या आयुधांसह आहे. अश्व हे त्याचे वाहन आहे. धर्मरक्षणार्थ आवतारपुरुष जन्म घेतात, अशी एक समजूत आहे. जोतिबांच्या मागे अशीच पार्श्वभूमी आहे. रत्नासूर आणि कोल्हासूर या राक्षसांनी अनाचार सुरु केला. करवीरवासियांनी या दैत्यांचा त्रास होत असे, म्हणून देवी महालक्ष्मीने केदारनाथांचा धावा केला. तेंव्हा केदारनाथांनी जोतिबांचे रूप घेऊन त्यांचा नायनाट केला. अकरा दिवसांच्या घनघोर संग्रामानंतर श्री जोतिबांनी श्री चर्पटअंबेच्या म्हणजेच चोपडाईच्या साहाय्याने रत्नासुराचा त्रिशुळाने वध केला.

तेंव्हा लोकांनी आनंदाने “चां S S ग भलं – चां S S ग भलं ” असा एकच जयघोष केला.ज्योतिबासंदर्भात एक कथा आहे. प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्यांनी हाहाकार माजवला होता. येथील जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती. कोल्हापूरच्या अंबाबाईलाही या दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. या राक्षसांच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्याकरिता अंबाबाईने तपश्चर्या करून केदारेश्वराला या दैत्याचा संहार करण्याची विनंती केली. केदारेश्वराने राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला म्हणून या डोंगराचे नाव वाडी रत्‍नागिरी पडले. रत्नासुराच्या वधानंतर अंबाबाईने अशी प्रार्थना केली, की ‘पुन्हा असे संकट येऊ नये म्हणून तुझी दृष्टी सदोदित माझ्यावर असू दे’ म्हणून अंबाबाईच्या रक्षणाकरिता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे.

३)ज्योतिबाच्या मंदिराची रचना : 

देवळांकडे जाताना प्रथम मराठाशैलीतील भव्य दगडी प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर पायऱ्या उतरताच तीन देवळांचा समूह दृष्टीस पडतो. या तीन देवळांच्या मध्यभागी केदारलिंगाचे मुख्य देवालय आहे. या मूळ देवालयाचे बांधकाम जोतिबा भक्त किवळ गावच्या नावजी ससे पाटलांनी (संत नावजीनाथ) केलेले आहे असे म्हणतात. १७३० मध्ये राणोजीराव शिंदे यांनी या जागी हल्लीचे देवालय बांधले. हे देऊळ ५७ फूट लांब, ३७ फूट रुंद असून त्याच्या शिखराची उंची ७७ फूट आहे. या देवळाशेजारी केदारेश्वराचे देवालय आहे. या देवालयाचे बांधकाम १८०८ मध्ये दौलतराव शिंदे यांनी केलेले आहे. या देवळाची लांबी ४८ फूट असून रुंदी २२ फूट आहे. शिखर ८९ फूट उंच आहे. केदारेश्वर देवळासमोर दोन पाषाणाचे नंदी आहेत. येथे असलेल्या रामलिंग मंदिराचे बांधकाम १७८० मध्ये मालजी निकम पन्हाळकर यांनी केलेले आहे. 

या मंदिराची लांबी १३ फूट, रुंदी १३ फूट असून शिखर ४० फूट उंच आहे. या देवळाजवळ चोपडाई देवीचे मंदिर असून या मंदिराचे बांधकाम १७५० मध्ये प्रीतिराव चव्हाण हिम्मतबहादूर यांनी केलेले आहे. या देवळांपासून थोडय़ा अंतरावर यमाईदेवीचे मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम १७५० मध्ये राणोजीराव शिंदे यांनी केले. या मंदिरासमोर पाण्याची दोन तीर्थ असून जवळच सहा कुंड व दोन विहिरी आहेत. कोल्हापूर परिसरातील मंदिराच्या शिखरांप्रमाणेच येथील मंदिरांच्या शिखरांची रचना आहे. यादवकालीन वास्तुशैलीत थोडा फरक करून मराठा कारागिरांनी या शिखरांचे बांधकाम केले. या शिखरांवर तळापासून वपर्यंत ‘रथपट्ट’ पद्धतीची साधी नक्षी आहे. येथील मंदिर हेमाडपंती पद्धतीची असून तत्कालीन मराठा वास्तुशैलीचा प्रभाव येथे आढळतो. या मंदिराच्या बांधकामाकरिता याच डोंगरात सापडणाऱ्या काळय़ा बेसॉल्ट दगडांचा वापर करण्यात आलेला आहे. या देवालयाच्या प्रांगणात पारंपरिक दगडी दीपमाळ आहेत.

जोतिबाचे आज जे मोठे मंदिर दिसते त्या ठिकाणी पूर्वी छोटेसे देवालय होते. हे मूळ मंदिर कराडनजीच्या किवळ येतील नावजी नामक भक्ताने बांधले व त्यानंतर आजचे जे देवालय आहे ते इ.स. १७३० मध्ये ग्वाल्हेरचे महाराज राणोजी शिंदे यांनी मूळच्या ठिकाणी भव्य स्वरूपात पुर्नचित करून बांधले. हे मंदिर साधे असून त्याचे बांधकाम उत्तम प्रतीच्या काळ्या बेसाल्ट दगडात करण्यात आले आहे. दुसरे केदारेश्वराचे देवालय, विशेष म्हणजे ते खांबांच्या आधाराशिवाय उभे आहे. हे मंदिर १५५ वर्षांपूर्वी म्हणजे इ.स. १८०८ मध्ये दौलतराव शिंदे यांनी बांधले. केदारलिंग व केदारेश्वर यामध्ये चर्पटअंबा म्हणचे चोपडाईचे देवालय आहे. ते इ.स. १७५०मध्ये प्रीतीराव चव्हाण, हिंमतबहादूर यांनी बांधले. या तीन देवळांचा एक गट होतो.

चौथे रामेश्वराचे देवालय, हे इ.स. १७८० मध्ये मालजी निकम, पन्हाळकर यांनी बांधले. केदारेश्वरसमोर एका लहानशा चौथऱ्यावर दोन काळ्या दगडात नंदी आहेत. हेही दौलतराव शिंदे यांनी बसविले. देवालयाचे पूर्वेकडील बाहेरील बाजूस सटवाई पूर्वाभिमुख आहे. पश्चिमेस रामलिंग पूर्वाभिमुख आहेत. देवालयाचे भिंतीवर पाच, सहा ठिकाणी वीरगळ दगडही बसविले आहेत. “श्री केदारनाथाने जोतिबा डोंगराभोवती बारा ज्योतिर्लिंग स्थापन केली म्हणून त्यांना ‘ज्योतिर्लिंग’ असेही म्हणतात. बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना करताना त्यांनी सर्व प्रथम त्यांच्या मूळ अवतीर्ण ठिकाणाचे स्मरण म्हणून हिमालयातील केदारेश्वर लिंग स्थापन केले म्हणून त्यांना केदारलिंग असेही म्हणतात.

 ”ज्योतिबाची मूर्ती काळ्या घोटीव पाषाणात घडविलेल्या या चर्तुर्भुज मूर्तीच्या हातात खड्ग, पानपात्र, डमरू व त्रिशूळ आहे. शेजारीच ज्योतिबाचे उपवाहन शेष आहे. ज्योतिबाचा शरीररक्षक काळभैरव बाहेरच्या बाजूस असून तेथे मूळ ज्योत तेवत असते. ज्योतिबाचे दर्शन घेण्याअगोदर काळभैरव व ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. ज्योतिबाची भार्या यमाई हिची मूर्ती दगडाची असून या मूर्तीला शेंदूर लेपलेला असतो. येथील वाडी रत्‍नागिरी गावात पुजारी व दुकानदारांची घरे आहेत.

५)जोतिबाचा लवाजमा : मानाचे उंट घोडे : 

श्रीक्षेत्र जोतिबा डोंगरावर दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या धार्मिक विधीत उंट, घोडा, हत्ती या मानाच्या प्राण्यांना पूर्वीपासून मोठा मान आहे. पालखी सोहळे, पूजाअर्चा, धुपारती सोहळा यात उंट, घोडा, हत्ती यांचा सहभाग असतो. जोतिबाचे वाहन म्हणून घोड्यास मान आहे. प्रत्येक शनिवारी जोतिबाची घोड्यावर बसलेली पूजा बांधली जाते. यावेळी मानाचा घोडा मंदिराच्या मुख्य कमानीत ( नावजींची कमान ) पूजा उतरेपर्यंत उभा करण्यात येतो. दर रविवारी दुपारी बारा वाजता व रात्री साडे आठ वाजता निघणाऱ्या पालखी सोहळ्यासमोर हे मानाचे प्राणी सजवून खडे केलेले असतात. जोतिबाच्या चैत्र यात्रेत तर या प्राण्यांवर गुलाल, खोबरे, खारीक यांची प्रचंड उधळण होते.

६)श्री जोतिबाचे वस्त्र व अलंकार : 

श्री जोतिबा देवाची मूर्ती स्थानिक काळ्या पाषाणात घडवलेली असून ती साधारण पणे ४ फूट ३ इंच उंचीची आहे. मूर्ती चतुर्भुज असून क्रमणपद अर्थात डावा पाय किंचीत पुढे टाकलेल्या स्थितीत उभी आहे. उजव्या हातात खड्ग, वर डमरू डावीकडे त्रिशूल आणि खाली अमृत पात्र असून कमरेला पंचा असून गळ्यात कंठहार आहे. माथ्याला नऊ वेटोळ्याची जटा आहे. हातात कडे आणि पायांत तोडे असून कानात नाथपंथी गोल कुंडलं आहेत. दररोज श्रींच्या वस्त्रालंकाराने सालंकृत पूजा बांधल्या जातात. श्रींच्या खड्या पूजेस डोईस मराठेशाही पगडी, बारा बंदी अंगरखा, शेला असा वेश असतो. अंगावर सोन्याचे विविध दागिने असतात. पायात सोन्याचे तोडे, हातांच्या बोटात हिरेजडित अंगठ्या असतात. गळ्यात सोन्याच्या विविध माळा, डोईस शिरपेच असे अलंकार असतात.

७)दख्खनच्या राजाला तोफेची सलामी : 

जोतिबा डोंगरावर महत्त्वाच्या सोहळ्या वेळी तोफेची सलामी दिली जाते. दर रविवार व पौर्णिमेच्या दिवशी पालखी सोहळा होतो. यावेळी रात्री नऊ वाजता तोफेची सलामी दिली जाते. विजया दशमीदिवशी सोने लुटण्याच्या कार्यक्रमावेळी सायंकाळी सहा वाजता पाच वेळा तोफेची सलामी दिली जाते. चैत्र यात्रा काळात मुख्य मंदिराच्या परिसरात दोन वेळा तर यमाई मंदिराच्या परिसरात एक वेळा सलामी दिली जाते. गुढी पाडव्याला पंचांग वाचण्यापूर्वी, रामनवमी, श्रीकृष्ण जन्माष्टमी, काळभैरव जयंती या दिवशी तोफची सलामी दिली जाते.

८)नंदीचे देवालय : 

जोतिबा मंदिर परिसरात केदारनाथांच्या देवालयाशिवाय इतर काही वैशिष्ट्यपूर्ण अशा मंदिरांचा समूह आहे. यातीलच नंदीचे हे देवालय होय. या मंदिराचे वैशिष्ट्यं असे कि, हे मंदिर दक्षिणाभिमुख आहे. तसेच या ठिकाणी एका ऐवजी दोन नंदी आहेत. हे दोन्ही नंदी काळ्या दगडातील आहेत. असे मंदिर क्वचित ठिकाणीच आढळते. हे मंदिर ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्यातील दौलतराव शिंदे यांनी इ. स. १८०८ मध्ये बांधले.

९)महादेवाचे मंदिर : 

नंदी मंदिरासमोर महादेवाचे मंदिर दिसते ते उत्तराभिमुख आहे. या मंदिराच्या आतील मंडपाला आधारासाठी एकही खांब नाही. हा स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणता येईल. मंदिराच्या आतील गाभाऱ्यात केदारेश्वर, काशी विश्वनाथ ही केदारेश्वर लिंगे आहेत. श्री केदारनाथाने आपल्या भक्तांसाठी या डोंगरावर बारा ज्योतिर्लिंगे स्थापन केली. त्यातील पहिले लिंग म्हणजे केदारनाथ. या लिंगाच्या पूर्वेकडील बाजूस आणखी एक लिंग असून त्यास काशी विश्वनाथ असे म्हणतात. हे मंदिर बांधताना ग्वाल्हेरच्या शिंदे यांनी नर्मदेहून आणलेल्या लिंगाची स्थापना केली. या तीन लिंगांनी स्थापित हे मंदिर अध्यात्मशास्त्र व उत्कृष्ट स्थापत्य कला यांचा एक दुर्मिळ व उत्कृष्ट आविष्कार म्हणता येईल.

१०)चोपडाई देवी मंदिर : 

 महादेव मंदिराला जोडूनच आदिमाया चोपडाई देवीचे मंदिर आहे. हे मंदिर कलात्मक व वैशिष्ट्यपूर्ण असून देवी पश्चिमाभिमुख उभी आहे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीतील असून केदारेश्वराच्या मंदिरापेक्षा दाक्षिणात्य पद्धतीचे आहे.शश्री केदारनाथांच्या दक्षिण मोहिमेमध्ये ज्या आदिमाया शक्तींनी केदारनाथांना साह्य केले त्यांतील एक आदिशक्ती चोपडाई देवी ( चर्पट आंबा ) हि महिषासुरमर्दिनी दुर्गा यांचेच हे प्रकट रूप आहे. देवीच्या समोर मंडपात चार खांब असून ते चारीही पुरुषार्थाचे अंग आहे.जोतिबा मंदिराच्या सभोवती जोतिबाचे अष्टप्रधान म्हणजेच अष्टभैरव यांची स्थापना केलेली आढळते. यामध्ये काळभैरव, बाळ भैरव, सुवर्ण भैरव, गंड भैरव , आकाश भैरव, कल्पांत भैरव आहेत. अष्ट भैरवांशिवाय आदिनाथ, रामेश्वर, शंख भैरव आदी देवतांची स्थापना मंदिर परिसरात झाली आहे. जोतिबा मंदिर परिसरात हरिनारायणाचे लहान मंदिर आहे.

११)काळभैरव : 

केदारनाथांच्या अवतार कार्यात काळभैरव यांनी अलौकिक व महत्वपूर्ण कामगिरी पार पाडली म्हणून करवीर निवासिनी महालक्ष्मी यांनी भैरवसेनेच्या सरसेनापतिपदी त्यांची निवड केली. केदारनाथांनी अवतार धारण केल्यानंतर महालक्ष्मीच्या विनंतीवरून दक्षिण दिग्विजयी मोहिमेला प्रारंभ काशीतून केला. त्यावेळी श्री काळभैरवांनी या अलौकिक कार्यात सहभागी करून घेण्याची विनंती केली. केदारनाथांनी त्यांची विनंती आनंदाने मान्य करून त्यांना दक्षिण मोहिमेत सहभागी करून घेतले. पुढे तोरण भैरव रत्नासुराला मिळाल्यानंतर महालक्ष्मीने केदारनाथांना काळभैरवांना भैरव सेनेचे सेनापती करावे, असे सुचविले. त्याप्रमाणे त्यांना भैरव सेनेचा सरसेनापती केले. काळभैरवाने आपल्या अलौकिक पराक्रमाने दक्षिण मोहीम यशस्वी करण्यात सिंहाचा वाटा उचलला. अनेक बलाढ्य राक्षसांचा नि:पात केला व त्या ठिकाणी तीर्थांची स्थापना केली.

काळभैरव हा शिवशंकराच्या अंशापासून उत्पन्न झालेला प्रखर व तेजस्वी अवतार आहे. काळभैरवाचे रूप मोठे लोभसवाणे आहे. चतुर्भुज मूर्ती, हातात त्रिशूल, डमरू, खड्ग व अमृतपात्र असून ते केदारनाथांप्रमाणे उभे आहेत. काळभैरव भैरवांचा नायक व रत्नागिरी पर्वताचा म्हणजे श्री क्षेत्र वाडी रत्नागिरीचा क्षेत्रपाल व दंडकंधारी आहे. असा क्षेत्रपाल महाकाळ धुंडिराज काळभैरव या वाडी रत्नागिरीवर रक्षकरूपी वैभव असून या क्षेत्राचा अधिपती असल्याने नारळ वाढविण्याचा मान त्यांना दिला आहे.

१२)नावजी बुवांबद्दल :

जोतिबाच्या मुख्य मंदिरातून बाहेर आल्यावर दक्षिणद्वारापुढे जेथे कापूर-अगरबत्ती लावली जाते, त्या पायरीला लागून असलेली आडवी मूर्ती म्हणजे केदारनाथांचे परम भक्त  नावजी यांचे स्थान आहे.

१३)उत्सव : 

ज्योतिबाच्या जन्मदिवशी रविवारी व श्रावणशुद्ध षष्ठीला येथे भाविकांची मोठी गर्दी होते. रत्नासुरावर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ चैत्री पौर्णिमेस येथे भव्य जत्रा भरते. कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व देशाच्या इतर भागांतूनही लाखो भाविक येथे गोळा होतात. ज्योतिबाचा डोंगर माणसांनी अक्षरशः फुलून जातो. येथे धान्य, कापड, तांब्या-पितळेची भांडी, पूजासाहित्य व मेवामिठाई इत्यादी साहित्याची दुकाने थाटली जातात. चैत्री पौर्णिमेच्या दिवशी ज्योतिबाच्या मूर्तीची प्रदक्षिणा देवळाभोवती घातली जाते. नंतर ज्योतिबाच्या चांदीच्या मूर्तीची मिरवणूक पालखीतून वाजत गाजत यमाईदेवीच्या मंदिराकडे निघते. या मिरवणुकीत अनेक सासणकाठय़ा नाचवत नेल्या जातात. ज्योतिबाच्या यात्रेत पन्नासहून अधिक छोटया मोठ्या सासन काठ्या असतात.पहिला सासनकाठीचा मान सातारा तालुक्यातील तीर्थक्षेत्र निनाम(पाडळी) गावाचा आहे. गडद गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचे उच्य रेश्मी वस्त्र, धवळ रंगाचे गंगवान ,सूती तोरण्या, आणि बसण्यावर सुर्वण पादुका, असा साज असतो. या सासनकाठीला १८ देवसेवक आहेत, तीर्थक्षेत्र निनाम (पाडळी )गावाचे गावाचे भक्त १२० कीलो मीटर हून जास्त अंतर म्हणजे ते वाडी रत्‍नागिरी येथे ४ दिवसांमध्ये सासनकाठी पायी उचलुन नेतात.परतीचा प्रवास मिळून हा प्रवास ८ दिवसांचा असतो.

 सासनकाठीचा प्रवास सुरू असतांना सासन काठीचे वजन ३०० किलोहून जास्त असते.(सासनकाठी आणि श्रीफळाची तोरणे,धन,हारतुरे इत्यादी) सासणकाठी म्हणजे ४५ ते ५० फूट उंचीच्या वेळूला पांढरी व तांबडी पागोटी एकाआड एक तिरपी गुंडाळलेली असतात. काठीच्या टोकाला गंगावनाचे काळे किंवा पांढरे झुपके बांधतात. या बांबूच्या तळापासून चार ते पाच फूट उंचीवर आडवी फळी घट्ट बांधलेली असते. ही फळी खांद्यावर घेऊन भक्तगण काठी नाचवतात. या काठीचा तोल जाऊ नये म्हणून काठीला बांधलेले दोर ताणून लोक उभे असतात. या फळीवर घोडय़ाची व देवाची प्रतिमा ठेवलेली असते. यातील काही काठय़ा पूर्वापार मानाच्या असतात. ढोलताशाच्या तालावर भक्तगण देहभान विसरून काठय़ा नाचवत असतात. निळसर गुलाबी गुलालाच्या धुराळय़ात या रंगबिरंगी काठय़ांची शोभा अवर्णनीय असते. या वेळी भाविक चांगभलेचा गजर करीत असतात. इतर काही महत्त्वाच्या मानाच्या शासनकाठ्या मध्ये मौजे विहे(पाटण),नावजीबाब किवळ,हिम्मत बहादूर चव्हाण, वाळवा तालुक्यातील करंजवडे गावातून येणारी ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांची सासनकाठी , कोल्हापूर छत्रपती या काठ्यांचा समावेश होतो.मानाच्या अठरा व एकूण शहाण्णव सासनकाठ्या उत्सवात सहभागी होतात.पूर्वी ज्योतिबा देवस्थानास शिंदे सरकारांकडून अनुदान मिळत असे. सध्या इनामी गावांच्या उत्पन्नातून देवस्थानचा खर्च भागविण्यात येतो.

१४)श्री ज्योतिबाची महाराष्ट्रातील अन्य देऊळे : 

श्री ज्योतिबा मंदिर कासेगाव (ता.वाळवा जि. सांगली). 

श्री ज्योतिबा मंदिर गिरजवडे(ता. शिराळा जि. सांगली).

श्री तीर्थक्षेत्र ज्योतिबा मंदिर निनाम (पाडळी) (जि.सातारा).

श्री तीर्थक्षेत्र कुसवडे जोतिबा मंदिर कुसवडे (जि.सातारा).

श्री ज्योतिबा मंदिर जळव.

श्री ज्योतिबा मंदिर  किवळ (ता. कराड).

श्री ज्योतिबा मंदिर  रेठरे बुद्रुक (ता. कराड).

श्री ज्योतिबा मंदिर  विहे (ता. पाटण).

श्री ज्योतिबा मंदिर  कुमठे (कोरेगाव).

श्री ज्योतिबा मंदिर  मुळगाव (ता. पाटण.) येथे यमाई जोतिबा दोन्ही मंदिरे आहेत. 

श्री ज्योतिबा मंदिर  गुंधा(वडगाव)(ता.बीड जि.बीड) येथे यमाई जोतिबा दोन्ही मंदिरे आहेत.

तसेच संपूर्ण महाराष्ट्राभर गावोगावी श्री ज्योतिबाची अनेक मंदिरे आहेत.

१५)कसं पोहोचाल ? :

जवळपासची रेल्वे स्थानके : 

छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर – 20 किमी

सांगली रेल्वे स्टेशन – 55 किमी

जवळचे बस स्थानक: कोल्हापूर 

 कोल्हापूर  बस स्थानकावरून सकाळी दहा  ते  दुपारी सहा  या दरम्यान  तासाने बसेसची सोय आहे 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top