लोहगड किल्ला

लोहगड किल्ला तटबंदी आणि बुरुज: लष्करी स्थापत्यशास्त्रातील एक धडा

लोहगड किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात मळवली या गावात आहे. भारत सरकारने  या किल्ल्याला  दिनांक २६ मे, इ. स.१९०९ महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित म्हणून घोषित केलेले आहे. लोणावळ्याच्या मळवली स्थानकाजवळ हा किल्ला आहे. लोहगड किल्ला शेजारीच असलेल्या  विसापूर किल्लाच्या बाजूला आहे. लोहगडावरुन  पवना धरणाचे सुंदर दृश्य दिसते. नाणे मावळ आणि पवन मावळ यांच्या डोंगररांगेत हा किल्ला आहे.

इतिहास :

लोहगड किल्ला हा अतिशय मजबूत आणि बुलंद आणि आहे. जवळच  भाजे आणि बेडसे बौद्धिक लेणी ज्याची  निर्मिती त्याही आधी इ.स.पू. २००० आहे.या किल्ल्याने सातवाहन,चालुक्य,यादव या राजवटी पाहिल्या.इ.स. १४८९ मध्ये मलिक अहमदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून  घेतले.  त्यापैकीच लोहगड हा एक. इ.स. १५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा राजा पूर्ण बुऱ्हाण निजाम किल्ल्यावर कैदेत होता. इ.स. १६३० मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. १६५७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि   लोहगड–विसापूर हा सर्व परिसरसुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला. इ.स. १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मुगलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे १३ मे १६७० मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकला.पहिल्या सुरत लुटीच्या वेळेस आणलेली संपत्ती सरसेनापती  नेताजी पालकरने यांनी  लोहगडावर आणून ठेवली होती. इ.स. १७१३मध्ये शाहूमहाराजांनी  लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला. १७२० मध्ये आंग्ऱ्यांकडून तो पेशव्यांकडे आला. १७७० मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बांबळे याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला.पुढे  १८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला. पण नंतर दुसऱ्या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. ४ मार्च १८१८ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. तेव्हा दुसऱ्या बाजीरावाने गडावरच्या मराठ्यांना गड रिकामा करायचा हूकुम सोडला.

लोहगड किल्ल्यात पाहण्यासारखी ठिकाणे :

गडावर चढतांना सलग चार प्रवेशद्वारांमधून आणि सर्पाकार मार्गावरून जावे लागते.

१.गणेश दरवाजा :

ह्याच्याच डाव्या – उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटिलकी देण्यात आली होती.येथे आतील बाजूस शिलालेख आहेत.

२.नारायण दरवाजा :

हा दरवाजा नाना फडणवीसांनी बांधला. येथे एक भुयार आहे, जिथे भात व नाचणी साठवून ठेवण्यात येई.

३.हनुमान दरवाजा :

हा सर्वात प्राचीन दरवाजा आहे.

४.महादरवाजा :

हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. यावर हनुमानाची मूर्ती कोरली आहे. ह्या दरवाज्यांचे काम नाना फडणीसांनी १ नोव्हेंबर १७९० ते ११ जून १७९४ या कालावधीत केले. 

५.दर्गा :

महादरवाज्यातून आत शिरताच एक दर्गा लागतो. दर्ग्याच्या शेजारी सदर व लोहारखान्याचे भग्न अवशेष आढळतात. याच दर्ग्याच्या बाहेर बांधकामाचा चुना बनविण्याची घाणी आहे. 

६.जुन्या तोफा :

उजवीकडे ध्वजस्तंभ आहे. याच्या जवळच  काही तोफा हौशी दुर्गप्रेमींनी सिंमेटच्या चौथऱ्यात बसवल्या आहेत. अशीच एक तोफ तुटलेल्या अवस्थेत लक्ष्मीकोठीच्या समोर पडलेली आहे.

७.शिवमंदिर :

गडावरती एक जुने शिवमंदिर आहे.शिवमंदिराचे बांधकाम हे जुन्या दगडी पद्धतीचे आहे.मंदिरसमोर एक नंदी आहे.मंदिरात दगडी शिवपिंड आहे.

८ .पाण्याचे टाके :-

त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके देखील आहे. ही गडावरील पिण्याच्या पाण्याची एकमेव सोय आहे. 

९.पाण्याचे तळे : 

तिथून पुढे पंधरा ते वीस मिनिटे चालत गेल्यास एक मोठे तळे आढळते. नाना फडणवीसांनी या तळ्याची बांधणी केली आहे. हे तळं सोळाकोनी आहे.

१०.विंचू काटा :

मोठा तळ्याच्या पुढे विंचूकाटाकडे जातांना वाड्यांचे काही अवशेष दिसतात. लक्ष्मी कोठीच्या पश्चिमेस विंचूकाटा आहे. हा विंचूकाटा म्हणजे पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी ही डोंगराची सोंड आहे. विंचूकाटयावर जाण्यासाठी एक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते . गडावरून पाहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो, म्हणून यांस विंचूकाटा म्हणतात. 

गडावर जाण्याच्या वाटा :

लोहगडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत :

१) पुण्यावरून अथवा मुंबईवरून येतांना लोणावळ्याच्या शेजारच्या मळवली स्थानकावर पॅसेंजर गाडीने किंवा लोकलने उतरावे. तेथून एक्सप्रेस हायवे पार करून भाजे गावातून थेट लोहगडला जाणारी वाट पकडावी. वाट मोठी आणि प्रशस्त आहे.तिथून दीड तासांच्या चालीनंतर ‘गायमुख’ खिंडीत येऊन पोहचतो. खिंडीच्या अलीकडेच एक गाव आहे त्याचे नाव लोहगडवाडी. खिंडीतून उजवीकडे वळले म्हणजे लोहगडास आणि डावीकडे वळले म्हणजे माणूस विसापूर किल्ल्यावर पोहचतो. या मार्गे लोहगडावर प्रवेश करतांना चार दरवाजे लागतात.

२) लोणावळ्याहून दुचाकी अथवा चारचाकी वाहनाने थेट लोहगडवाडीपर्यंत जाता येते. लोणावळा-भांगरवाडी-दुधिवरे खिंड-लोहगडवाडी. पवना धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर डावीकडे एक रस्ता लागतो तेथून ३ ते ४ किलोमीटरवर लोहगडवाडी आहे. उभा चढ आणि अतिशय धोकादायक वळणे आहेत. साधारण अर्धा तासाचा प्रवास आहे. मात्र येथे एस.टी. महामंडळाची सोय नाही. स्वतःचे वाहन असल्यास उत्तम अथवा लोणवळ्यातून टॅक्सीने  जाता येते मात्र टॅक्सीभाडे  १००० रु. आहे.

३) काळे कॉलनी ही पवना धरणाजवळ वसलेली आहे.तेथून लोहगड आणि विसापूर मधील गायमुख खिंड परिसर व्यवस्थित दिसतो.पवना धरणाच्या खालून एक रस्ता गायमुख खिंडीच्या डावीकडील टेक टेकडीवर जातो तेथून एक मळलेली पायवाट आपणास लोहगडवाडीत घेऊन जाते. या टेकडीवर अग्रवाल नावाच्या इसमाचा बंगला आहे. या वाटेने किल्ल्यावर जाण्यास २ तास लागतात. पुणे-पौड-कोळवण-तिकोना पेठ-दुधिवरे खिंड-लोहगडवाडी. तेथून अर्ध्या तासात लोहगड चढता येतो. वाटेत हडशीचा सत्यसाई आश्रम, प्रतिपंढरपूर हे देऊळ आणि पवना धरण बघता येते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top